Advertisement

madar teresa marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
madar teresa marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

मदर तेरेसा

गरिबांची आई
१९७९ साल. मदर तेरेसांना त्या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. या प्रतिष्ठित पुरस्काराचा स्वीकार करायला मदर तेरेसा विनम्र वृत्तीने गेल्या. जगात शांतता प्रस्थापित करण्याचा मानवतेची सेवा हाच राजमार्ग असतो. मदर तेरेसांनी हे सिद्ध केले होते, त्यामुळे त्यांची निवड निर्विवाद आणि पारितोषिकाचीच शान वाढवणारी ठरली; कारण गेल्या काही वर्षांत हा बहुमान मिळालेल्या व्यक्तींमध्ये राजकारणी नेते, पुढारी किंवा मुत्सद्दी होते. सतत ३१ वर्षे कोलकात्याच्या झोपडपट्टयांमध्ये काम करणारी स्त्री नव्हती! मदर तेरेसांमुळे भारतातल्या एकाच शहराचे नाव नोबेल पुरस्कारसाठी दुसऱ्यांदा जोडले गेले. देशोदेशीचे उच्च पदाधिकारी, मुत्सद्दी, विचारवंत यांच्या उपस्थितीत एका लहानखुऱ्या, कृश, खादीधाऱ्या मदरनी, जेव्हा एक लाख नव्वद हजार डॉलर्सचा तो पुरस्कार स्वीकारला, तेव्हा खूप वेळ टाळ्यांचा गगनभेदी कडकडात होत राहिला!
त्यानंतर मदर तेरेसा बोलायला लागल्या. एक स्मितवदन आणि काळजाला हात घालणारे साधेसे भाषण. त्या भाषणामागे आयुष्यभराची साधना होती. ते विद्वत्ताप्रचुर नव्हते; पण भावनांनी ओतप्रोत होते. सुमारे वीस मिनिटे चाललेच्या आभाराच्या भाषणाचा प्रारंभ मदरनी प्रार्थनेने केला. बोलताना त्या कितीदा गहिवरल्या. श्रोत्यांचे डोळेही ओले झाले.
मदर तेरेसा म्हणाल्या, ''व्यक्तिश: मला असं वाटतं, की मी या पुरस्कारासाठी पात्र नाही; पण माझ्या गरीब बांधवांच्या वतीनं मी त्याचा स्वीकार करते. मला हा पुरस्कार देऊन नोबेल कमिटीनं एक प्रकारे गरीब देशांचाच गौरव केला आहे. जगातल्या गरिबांना मान्यता मिळाली आहे." "आपण या जगात प्रेम करायला आलो आहोत. एक वेळ पोटाची भूक भागवता येईल; पण प्रेमाची भूक भागणं फार कठीण. आपल्या कुटुंबातच अशी एखादी व्यक्ती असेल, जी प्रेमाची भुकेली असेल, तिला प्रेम द्या. घरातून सुरू झालेलं प्रेम जगभर पसरू शकेल."
शांतता तरी का नष्ट होते? माणसाच्या किमान गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत, म्हणून आज जगभरात लाखो मुलं मरताहेत. भूक, दैन्य अशा अनेक कारणांनी. मला माझ्या गरीब आणि अनाथबांधवांनी अमाप प्रेम दिलं आहे. तुम्हीही तुमच्या देशापासून सुरुवात करा. गरीब शोधा आणि प्रेम करायला लागा. तुम्ही कधी भूक जवळून पाहिली आहे की नाही मला माहीत नाही. मी ती पाहिली आहे. भूक शरीरावर, डोळ्यांतून फार दारुण तऱ्हेने व्यक्त होते. अशांच्या तोंडी एक घास घातला, तरी ते लोक जन्मभर पुरेल इतकं प्रेम मला देतात. हे माझं केवढ भाग्य! छोटस हसू. मनापासून आलेलं. ती प्रेमाची सुरुवात असते. या हसण्यानं आपण स्वत:च आणि दुसऱ्याच आयुष सुखी करू शकतो. कुटुंबातसुद्धा एकमेकांना अस प्रेमाच हसू द्या. जीवन सुंदर होऊन जाईल. नोबेल प्राईझ ही नॉर्वेजियन लोकांनी मला दिलेली सुंदर भेट आहे. या रकमेतूनमी घर नसलेल्या लोकांसाठी घर बांधून घेणार आहे. प्रेम घरापासूनच सुरू होतं अशी माझी श्रद्धा आहे. घरच नसेल, तर प्रेम कुठून येणार? म्हणूनच गरिबांना घर द्यायची." जगभर केवळ गरीब देशातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशामध्येही मला दूर करायला अतिशय अवघड अशी गरिबी आढळली. रस्त्यावरच्या एखाद्या उपाशी भिकाऱ्याला उचलून आणून मी त्याला बशीभर भात देते, तेव्हा त्याची भूक मिटते; पण जी व्यक्ती नकोशी आहे, एकटी आहे. समाजानं जिला टाकून दिलेल आहे, त्या व्यक्तीची गरिबी फार क्लेशकारक आहे.
मदर तेरेसांचे भाषण संपले, तेव्हा प्रत्येक व्यक्ती विचारात बुडून गेली होती. मदरनी नोबेल कमिटीला असे आवाहन केले, की वितरण सोहळ्यानंतरची रद्द करावी. त्या वाचलेल्या पैशांतून गरिबांना जेवण द्यावे. या विनंतीने सर्वांच्या हृदयांना उदात्ततेचा स्पर्श झाला. भावनांचा एकच कल्लोळ उमटला. नॉर्वे, स्वीडन, युरोपमधल्या सामान्य माणसांनी पैसे दिले. लहान मुलांनी आपला पॉकेटमनी दिला. बघता बघता ३६ हजार पौंड जमले. मेजवानीचे जे पैसे वाचले होते, ते तीन हजार पौंड त्यात घातल्यावर ती रक्कम नोबेल पारितोषिकाच्या रकमेच्या जवळ जवळ निम्मी झाली. अनेक देशांना त्यांच्यावर चित्रपट करायचे होते. जपानी टेलिव्हिजनचे एक पथक आले होते. मदर त्यांना म्हणाल्या, "नो सॉरी. आता पुरे झालं ते. नो मोअर ग्लॅमर अॅण्ड पब्लिसिटी. मला माझ्या सेवेच्या साध्या आयुष्याकडे परत वळू द्या. आपले खरे काम कोणते हे एकदा पक्के झाले, की त्या खऱ्या कामापासून दूर नेणारे काहीही अशा थोर व्यक्तींना आवडत नसंते. मग ती कीर्ती असो, की पैसा.