Advertisement

marathi lokmany tilik bal gangadhar tilak लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi lokmany tilik bal gangadhar tilak लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ जुलै, २०१४

बाळ गंगाधर टिळक

आपले सारे आयुष्य देशकार्यासाठी वाहून घेणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी रत्त्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक, त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना 'लोकमान्य' ही पदवी दिली होती. आईचे नाव पार्वतीबाई होते तर वडील गंगाधरपंत हे संस्कृत पंडित आणि गणितज्ञ होते. त्यामुळेच टिळकांनीही संस्कृत, गणित विषयांमध्ये प्रभुत्व मिळविले. टिळक पुण्याला कॉलेज शिक्षणासाठी आले तेव्हा त्यांच्या किरकोळ शरीरयष्टीकडे मित्र त्यांची चेष्टा करत. मग मात्र सुदृढ प्रकृती होण्यासाठी टिळकांनी एक वर्ष अभ्यास बाजूला ठेऊन व्यायाम केला. या दणकट प्रकृतीमुळेच त्यांनी देशसेवा करताना शारीरिक कष्टांना हसत तोंड दिले.
आपला देश संपन्न व संस्कृती महान असून इंग्रजांच्या गुलामगिरीत का? आपला समाज मागे का? असे टिळकांना प्रश्न पडून लोकजागृती करण्यासाठी आपले आयुष्य खर्च करण्याचा त्यांनी निश्चय केला. आगरकर, चिपळूणकरांच्या मदतीने टिळकांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' सुरू केले व फर्ग्युसन कॉलेज काढले.
लोकशिक्षणासाठी टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' वर्तमानपत्रे सुरू करून त्यातून इंग्रज सरकारविरूध्द लेख लिहिले व लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे सार्वजनिक गेणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू करून देशभक्तीपर व्याख्याने व गाण्यातून लोकांना स्वराज्य मिळविण्याची स्फूर्ती दिली. टिळक इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करीत होते म्हणून इंग्रजांनी त्यांना 'असंतोषाचे जनक' ठरवले.
१९ व्या शतकाच्या अखेरीस प्लेग व दुष्काळात सापडलेल्या जनतेला टिळकांनी गावोगावी जाऊन धीर दिला, मदत केली, त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांच्या अत्याचाराचा धिक्कार केला. स्वातंत्र्य लढ्याला सूत्रबद्धता यावी म्हणून स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण असा चौपदरी कार्यक्रम आखला. परदेशी मालाच्या होळ्या पेटल्या. देशभर असंतोषाचा डोंब उसळला. टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून १९०८ साली सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात त्यांना ठेवले गेले. तेथे टिळकांनी 'गीतारहस्य' नावाचा ग्रंथ लिहिला. तेथील सुटकेनंतर त्यांनी अॅनी बेझंट यांच्याबरोबर 'होमरुल चळवळ' सुरू केली. 'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' अशी घोषणा केली. हिंदु-मुस्लिम एकजुटीसाठी त्यांनी 'लखनौ करार' घडवून आणला. कामकरी व बहुजन वर्गास संघटित करणारे ते तेल्या तांबोळ्यांचे पुढारी झाले.
टिळक विवेकनिष्ठ व विचारी तत्त्वज्ञ होते. 'ओरायन' व 'आर्क्टिक होम इन द वेदाज्' हे ग्रंथ त्यांनी लिहिले. एक शास्त्रशुध्द पंचांगही सुरू केले. अशा प्रकारे लोकसेवेचे व स्वातंत्र्यलढ्याचे व्रत आयुष्यभर चालविणाऱ्या पहाडांसारख्या टिळकांचे १ ऑगस्ट, १९२० रोजी मुंबईत देहावसान झाले.